आयुष्य किती क्षण भंगुर आहे हे दिवसेंदिवस कळत आहे. पण एकदम जवळून कधी जाणवलंच नव्हतं आजपर्यंत. ईदचा तो दिवस, हसती खेळती माझी काकू, जिला आम्ही तई म्हणून हाक मारायचो. ती काळाच्या पडद्याआड झाली. या निर्दयी काळाने तिच्यावर अकाली झडप मारून तीेला आमच्यापासून कायमचं दुर घेऊन गेला.
दुपारी दोनच्या सुमारास भावाचा फोन आला, “तईला अड्मिट केलंय कल्याणला आणि क्रिटिकल हाय म्हण तब्येत.” बंधू
हे ऐकुन मी जवळपास ओरडलेच, “अरे हे काय म्हणतोय तू? आणि अचानक असं काय झालं?”
“कालच तर व्हिडिओ कॉल सुरू असताना तिचा आणि आईचा हसत संवाद ऐकला होता” मी भरल्या डोळ्यांनी बंधुला विचारलं.
“काय माहिती गं, मला पण तोच धक्का लागलाय. समजत नाहीये काय झालंय, सगळेजण निघालेत तिकडेच हॉस्पिटलला” बंधू.
त्याचा फोन ठेवला आणि हात जोडून देवाला प्रार्थना केली, “देवा काही ही कर पण तईला बरं कर. तू असा एवढा मोठा घात आमच्यासोबत करूच शकत नाहीस.”
मन काही केल्या लागत नव्हतं, सर्व कॉल्स , सर्व संवाद नको त्याचं दिशेला जात होते आणि दोन तासानंतर आयुष्यात कधी ऐकेलं असं वाटलं नव्हतं, तीच खबर कानावर आणि मनावर आदळत होती. डोळ्यातून अश्रु धारा आपोआपच व्हायला लागल्या. मी अजुनही देवाला विनवणी करत होते,
“तिला बरं कर, हे जे ऐकलंय ते खोटं निघू दे.”
“तू देव आहेस ना, मग काही चमत्कार दाखव. देवा प्लीज तिला परत पाठव आमच्याकडे प्लीज”.
“त्या पोरांच्या चेहऱ्याकडे बघ, त्यांना असं पोरकं करायचा जीव तरी कसा होतोय तुझा?”
मन तीन महिन्यापूर्वी झालेल्या आणि शेवटच्या ठरलेल्या भेटीत हरवून गेलं.
“आयी, ये गं सुलू आल्यापासून घरच्या बाहेर नाहीस बघं” तई म्हणाली.
“नाहीये तई, प्रवास करून थकले होते. मग जरा झोप काढले, म्हणून आले नाही बाहेर” मी.
“ये मग, चा(चहा) पिलीस का? चा करते मी ये” तई.
“होय, येते थांब ब्रश करून” मी.
हा संवाद तईचा मी गेल्यावर नेहमी ठरलेलाच असायचा. मी घरी गेल्यावर तई चहा करायची आणि चुली समोर बसून मी प्यायचे. मीच काय घरातले कोणतेही बहीण-भावंडं, जावई, नंदा, चुलते, कोणताही पै-पाहुणा येऊ देत तिच्याकडून बोलावणं असायचचं. बऱ्याच वेळा ती भाकरी करत असायची आणि मला चुलीवरची भाकरी नेहमीच आवडती असल्याने, मी त्यावर ताव मारायला विसरायचे नाही. गरम गरम भाकरी आणि भाजी विक्या सोबत बसून यावेळेस ही खाल्ली होती.
“एक एक गोष्ट ऐकना बग सूलु, नुसतं सतवतय बग ह्यनं” तई मोठा मुलगा विक्याची तक्रार करत म्हणाली.
“काय रे त्रास देताव उगाच, कळत नाही का विक्या?” मी विक्याला समजावत म्हणाले.
“अगं सारखं भाजी हीच काबर केलीस? ते तसच काबर केलीस? नुसतं जीव खावाव का माणसाने? एकतर काम करून जीव पुरे पुरे झालय” तई
” एकदा मी मरून गेल्यावर ह्यला कळतंय बघ तू” चिडून ती बडबड करायची आणि आमच्या घरातल्या प्रत्येक बायकांचं हे वाक्य ठरलेलं आहेच. चिडून राग व्यक्त करण्याची ही एक पध्दत.
“आयी असं का म्हणलालीस म्हणते, त्याची बायको आल्यावर बघ की बायकोला असच करतो का?”
” आपण इथच बसून बघायचं सगळे, असलं मरायचं कशाला बोलतीस बरं उगाच”मी म्हणाले.
त्यानंतर रात्री काढलेलं ताजं गायीचं दूध, एक ग्लास भरून प्यायला दिलं. शेतावरून आणलेलं, ऊस सोबत बसून खाल्लं. हुरडा खात जुन्या घरच्या कट्टयावर बसून, आम्ही कितीतरी गप्पा मारल्या. ते फेब्रुवारी महिन्याचे ५ दिवस तिच्यासोबतचे शेवटचे ठरतील, अस स्वप्नातही वाटलं नव्हतं.
आमचं घर आणि घरातले मंडळी संख्येने खूप जास्त. त्यात प्रत्येकाचे नातलग ही तेवढेच वाढलेले, नाती गोंतीचा जणू जंगल आज्जीने पसरवून ठेवलेला आहे. मी १ वर्षाची असताना माझी मोठी आई म्हणजेच मोठी चुलती देवाघरी गेली. आम्ही खूप लहान असल्याने तो धक्का आम्हाला लागला नसावा आणि काळानुरूप लवकर ते दुःख विसरून ही गेलो. त्यानंतर तब्बल २८ ते २९ वर्ष असं अकाली कुणी गेलंच नाही. जे गेले ते वयस्क होते, आईचे आई-वडील, बाबाचे आई-वडील,काकुचे आई-वडील हे सर्व वय झाल्यानंतर काळा आड झाले. त्यांचं दुःख व्हायचं पण ते अख्खं आयुष्य जगून गेले याचं समाधान ही असायचं.
फोनवर फोन, सर्वजण रडत होते. हा एवढा मोठा आघात कोणालाच सहन होत नव्हता. लॉकडाऊनमध्ये आम्ही सर्वजण अडकलो होतो, ते ही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी. इतकं हतबल कधीचं जाणवलं नव्हतं आयुष्यात, तईची एकुलती एक मुलगी ही पुण्यात आडकली होती. तीच्या जवळ असणं किती महत्वाचं होतं, तिला रडताना खांदा देणं किती महत्वाचं होतं. पण काहीच करता येत नव्हतं, अगदी काहीच नाही.
या कोरोना मुळे तिला आईचं अंत्यदर्शन ही व्हिडिओ कॉलिंगवर घ्यावं लागलं. याच्यापेक्षा विचित्र आणि वाईट आयुष्यात काय घडू शकतं? ती गेली दुसऱ्या दिवशी घरी, शेवटी न बघितलेल्या आईला तिची नजर शोधत होती. तिला या गोष्टीचा स्वीकारच नव्हता होतं की, तिला न भेटता तिची मम्मी निघून जाईल. तिला तसं बघून घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं हृदय पिळवटून निघत होतं. कोण समजवणार? आणि काय समजवणार? जे नुकसान झालंय, जे हरवलंय, त्याची भरपायी कशानेच होणारी नव्हती हे सगळे जाणुन होते.
त्यांची १९९० दशकातील लव्हस्टोरी होती, आम्ही चिडवायला लागलो की किती लाजायचे दोघेजण. घरी नवरी बनून आली, ३० वर्ष घरात संसार केला, अनेक नाती जोडली, ती जोडताना अनेक वेळा भांडण झालं असेल. कितीतरी वेळा आज्जीचा मार खाल्ला असेल (माझी आई आणि तई दोघी खूप मार खायच्या), मुला बाळासाठी किती राबला असेल तिचा जीव, दोघांनी मिळून सोन्यासारखा उभा केलेला संसार, पण तिला निघावं लागलं अर्ध्यावर सोडून. पण तीच्याविणा तो संसार चालेल तरी कसा?
किती ही काम असलं तरी नवऱ्याचा डब्बा पोहच करणारी ती. शेताचा, घराचा ७०% टक्के भार उचलणारी ती. कुठलाही कार्यक्रम असो हसऱ्या चेहऱ्याने त्यात उत्साहाने सहभाग घेणारी ती . राब राबणारा तिचा आत्मा, नवऱ्यासाठी, मुलासाठी चिंतेने व्याकुळ होणारा आत्मा, आम्हा सर्वांशी नेहमीच हसून बोलणारा आत्मा, कधी त्रासुन, चिडून रागाने ओरडणारा तिचा आत्मा, आपल्याचं संसाराकडे बघून सुखाने हसणारा तो आत्मा अनंतात विलीन झाला.. आई, काकू, भावजय, जाऊबाई, नंदा, आत्या, मामी, अशा कितीतरी नात्यांना अर्धवट सोडून ती चालती झाली. आज ही सर्व जोडलेली नाती डोळ्यात अश्रू घेऊन तिला शोधताय, तिच्यासोबत जगलेल्या प्रत्येक क्षणात तिचं अस्तित्व शोधताय. पण ती कधीच न दिसणाऱ्या, कधीच न परतणाऱ्या प्रवासाला निघून गेलीय.
तिचा आत्मा कुठे जवळपास असेल, आम्हाला दुरून नक्कीच बघत असेल. तिला एकच सांगायचं आहे,
“आता तू निवांत हो, विश्रांती घे. सतत ३० वर्ष राबलेल्या त्या आत्म्याला विश्रांती दे”.
” तुझं जाणं एक रितेपण देऊन गेलय कायमसाठी, तुझी जागा कुणीच घेऊ शकणार नाही, कुणीच नाही.”
“तुझं हसणं, तुझी स्वप्नं, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा जपण्याचं, पुर्ण करण्याचं काम तुझी पाखरं करतील.”
“तू निवांत हो, आमच्या डोक्यावर तुझ्या आशीर्वादाचा हात सदैव असू दे.”
“तुझ्या जोडलेल्या सर्व नात्याकडून भरलेल्या आसवांनी, जड झालेल्या अंतःकरणाने तुला भावपूर्ण श्रध्दांजली”..